Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label गर्भ संस्कार लेखन माला. Show all posts
Showing posts with label गर्भ संस्कार लेखन माला. Show all posts

Tuesday, November 22, 2016

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

#आयुमित्र

गर्भाधान पूर्वतयारी आणि आयुर्वेद

     सध्या लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. अनेक तरुण जोडपी आपल्या जीवनाची नवी सुरवात करणार आहेत. लग्न झाल्यानंतर पतीपत्नी संततीप्राप्ती गर्भाधानाकडे वळतात. आयुर्वेदात ह्याला सुद्धा एक संस्कार म्हंटलेले आहे. उत्तम व निरोगी संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असल्यास उचित गर्भाधान विधी करणे महत्वाचे आहे.
गर्भाधनाची पूर्वतयारी कशी करावी?

“शुध्दबिजा पोटी फळे रसाळ गोमटी..|”

जसे उत्तम व निरोगी फळासाठी बीजही उत्तम व शुध्द हवे, तसेच निरोगी व उत्तम संतती प्राप्तीसाठी शुक्र(पुरुष बीज) व शोणित( स्त्रीबीज) हे शुध्द असणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. शुध्द स्त्री व पुरुषबीजासाठी पतीपत्नीने खालील उपाय करावे.

1) दोघांनी वैद्यानकडून शरीरशुद्धी म्हणजेच पंचकर्म करून घ्यावे.

2) पुरुषाने गाईचे दुध, तूप आहारात घ्यावे तर स्त्रीने तीळ तेल व उडीद ह्याचा आहारात वापर करावा.( टीप– सोबत इतर आहार सुद्धा घेऊ शकता पण प्रामुख्याने वरील आहार घ्यावा. तसेच आपल्या वैद्यांशी संपर्क करून ह्या आहाराचे प्रमाण निश्चित करून घ्यावे.)

3) एक महिनाभर वरील आहार घ्यावा व ह्याकाळात दोघांनी ब्रम्हचर्य पालन करावे.(शरीरसंबंध ठेवू नये)  

वरील उपायांनी स्त्री व पुरूषबीज सुदृढ व शुध्द होते आणि पुढे उत्तम संतातीसाठीचे गर्भाधान करता येते. 

निरोगी संतती हि निरोगी समाज निर्माण करेल आणि निरोगी समाज निरोगी देश निर्माण करेल. 

(आजचा लेख खास माझ्या सर्व नव वर व वधु मित्र मैत्रीणीना समर्पित)

-वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693

drbhushandeo@gmail.com

Monday, September 12, 2016

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

एका रोपट्याला  योग्य वेळी  फळाफुलांनी बहर येण्यासाठी त्याची जोपासना/ ”संगोपन” उत्तम करायला हवे.याच फळातून पुढे उत्तम बीज तयार होते जे आपल्यासारखेच निरोगी सुधृढ रोपट्याची पुनंर्निर्मिती करते. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे,”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”!

या जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक असल्यामुळे निसर्गाचे नियम आपल्यालाही लागू होतात! वयात येण्याचा कालवधी हा महत्वपूर्ण असतो.त्याच वेळी स्त्री अथवा पुरुष देहात बीज निर्मिती ला सुरुवात होते. फार पूर्वी मुलगी रजस्वला झाली की आनंदोत्सव साजरा केला जाई. रजस्वला होणे हे बीजनिर्मिती आणि त्या अनुषंगाने गर्भधारणा करण्यास सज्ज असे दर्शवित असे. निसर्ग नियमानुसार असणाऱ्या या गोष्टी बद्दल मात्र  “आमचा जन्म काही फक्त मुल जन्माला घालण्यासाठी नाही झालाय” अशी अनास्थाही विशिष्ठ वयात आणि विचारसरणीत  दिसून येते.

गर्भाशय अथवा तदनुषंगिक येणाऱ्या पाळीचे स्वास्थ्य हे फक्त पुनरुत्पादनाच्या दृष्टीनेच सांभाळायचे आहे असे नाही तर स्त्री देहाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात तयार होणारे मल मुत्र जसे योग्य वेळी,योग्य स्वरुपात आणि  योग्य प्रमाणात बाहेर पडायला हवे तसेच पाळीचे रक्त अथवा रजही! पाळीचे आणि शरीराचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून आहेत. पाळीतून बाहेर पडणारे रक्त म्हणजेच रज हे शरीरातच तयार होते.घेतलेल्या आहारचे रुपांतर पहिल्या रसधातुत जर उत्तम झाले तर त्त्यापासून उत्तम रज तयार होते. म्हणजेच तुमचा आहार कसा आहे आणि त्याचे पचन शरीरात कसे होतेय यावर पाळीचे रक्त कसे तयार होणार हे अवलम्बून असते. आपल्या #metabolism मध्ये बदल झाला की हे चक्र देखील बिघडते. म्हणूनच  वयाच्या काही  विशिष्ठ टप्प्यावर म्हणजे पाळी येताना(उत्पत्ती), गर्भधारणेत(स्थिती),आणि पाळी जाताना (लय )पाळीत आणि शरीरात जे बदल घडतात त्यासाठी यांच्या स्वास्थ्याबद्दलच्या  concept clear असल्या पाहिजेत .

आणि राहिला प्रश्न , आपला जन्म कशाकरिता झालाय चा ?  तर , बाईचा काय किंवा पुरुषाचा काय जन्म का झालाय याचा शोध घेणे हेच खरे तर जन्माचे उद्दिष्ट्य आहे.
असो, आपण नवीन जीवाची निर्मिती करू शकतो हि खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.हे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतेच वयात येणाऱ्या मुलींशी  एक “हितगुज” झाले. पाळी सुरु होण्याच्या टप्प्यावर असणाऱ्या या मुलींन्ना या सर्वाची जेव्हा नैसर्गिक आणि शास्त्रोक्त माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या मनात असलेली “ आपल्यालाच हि कटकट का?”  अशी नकारात्मक भावना जाऊन त्या जागी चक्क “ यस्स्स्स आपल्याला काहीतरी विशिष्ठ शक्ती आहे!” अशी सकारत्मक भावना आली.यामुळे आता त्या वयाच्या या विशिष्ठ टप्प्यावर उत्सुक आहेत पाळी सुरु होण्यासाठी! पाळीचे स्वरूप नेमके कसे असायल हवे? पाळी सुरु होण्याचे नैसर्गिक प्रयोजन काय?आपल्या संपूर्ण स्वास्थ्यावर पाळीचे स्वास्थ्य अवलंबून कसे असते, या पायाभूत माहितीमुळे त्या नक्कीच उत्तम भविष्य साकारणार यात शंका नाही!

यालाच म्हणतात “संगोपन” , जे सुरु होते बीजापासून..............

क्रमशः
वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

पुनरुत्पादन हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गातल्या तीनही ऋतुंमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय या द्वारे पुनरुत्पादनाचे नियमन केले जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुनरुत्पादन चालूच असते!

सृजनाचे अथवा पुनर्निर्मितिचे हे कार्य अत्यंत नैसर्गिक आहे. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने निसर्गाचे नियम आपल्या शरीरालाही लागू पडतात. सुपीक भूमीवर पडलेले उत्तम बीज जसे अनुकूल हवामान,पोषण आणि ऋतु मिळाल्यावर भूमीतून तरारून वर येते त्याचप्रमाणे उदरात जीव तयार होत असतो.दोन जीव परस्परांच्या ‘स्नेहातून’ एका नवीन जीवाला जन्म देत असतात.

हि साधी सोपी नैसर्गिक गोष्ट सध्या दुरापास्त झालीये.

लग्नाचे वाढेलेले वय,धकाधकीचे जगणे,सतत चिंता-ताण,ऋतुचर्या –दिनचर्या पाळण्याचा अभाव, योग्य अन्न सेवन आणि व्यायाम करण्याबद्दलची अनास्था, कामशास्त्रा बद्दलची अपुरी,अयोग्य माहिती,शरीराला खूप ठिकाणी गृहीत धरणे, या आणि अशा कितीतरी गोष्टींमुळे आपण नैसर्गिक तत्वांपासून दुरावत चाललोय.

मुल होत नाही म्हंटल्यावर आधी येतात त्या होर्मोन टेस्ट आणि त्यांच्या आकड्यात झालेले बदल.मग सुरु होते hormonal चिकित्सा! पण इथे हा विचार केला जात नाही की hormones का बदलेलेत? कुणीही हि दखल घेत नाही की पाळी कशी येते? फक्त महिन्याच्या महिन्याला येणे गरजेचे नाही तर पाळीचे स्वरूपही निरोगी हवे. आपल्या शरीरातील संप्रेरके अथवा hormones स्वतःहून कमी जास्त होत नसतात.त्यामागे कारण असते आपले बिघडलेले चयापचय!

यावर काम करणे खरच कठीण असते?
याला वेळ लागेल म्हणून चटकन गुण येण्यासाठी वापरलेला हा shortcut त्वरित फलदायी असतो? तर मुळीच नाही. लागणारा वेळ लागतोच तिथेही.आणि वैद्यकीय भाषेत सांगायचे तर मुळ संप्राप्ती तशीच ठेवून बीज तयार होत नाहीये मग ते artificially stimulate करून वाढवले तरीही फलित होत नाही अथवा फलित झाले तरी त्या गर्भधारणेत अनेक complications होऊ शकतात.( सरसकट होतात असे नाही कृपया हा मुद्दा ध्यानात घ्या). अशा pregnancy चा बहुतेक काळ हा विविध medicines मध्ये जातो याचे पडसाद प्रत्यक्ष प्रसव/ delivery च्या वेळी जाणवतात. गर्भधारणा झाल्यानंतर नॉर्मल delivery साठी केलेले प्रयत्न तोकडे पडतात कारण मुळातच “ सुख प्रसवाचा” प्रवास हा तुमच्या पाळी सुरु होण्याच्या कालावधीपासून सुरु होतो तो कधी लक्षातच घेतला जात नाही.

गर्भधारणा हि नैसर्गिकपणे आणि सुखकर व्हावी, ९ महिन्यांचा कालावधी हा कुठल्याही complication शिवाय,कमीत कमी medicines युक्त असावा, प्रत्यक्ष प्रसव हा नॉर्मल असो व सीझर तो “सुख प्रसव” असावा. बाळंतपणा नंतरही सुतिका परिचर्या पाळली जावी  हेच खरे माता बालक स्वास्थ्य !!!

माता बालक स्वास्थ्य सगळ्यांनाच हवेय,त्यासाठी फक्त supplements चा प्रोग्राम हाती घेऊन चालणार नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन काम करायला हवेय.
यासाठीच हि संकल्पना आहे “सुख प्रसव आणि संगोपन”...............
क्रमश:

वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

Wednesday, August 3, 2016

गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

                                                                    !!! गर्भावस्था व बस्ति चिकित्सा !!!

अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९
      मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे अपान वायूचे कार्य आहे.
      कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामासाठी साठी निवडलेली जागा निर्मळ असावी ह्याबाबत दुमत असणे शक्य नाही. पूजा असो, स्वयंपाक असो वा दुसरे कोणतेही शुभकार्य असो स्वच्छतेला पर्यायच नाही. दिवसाची सुरुवातही मलमूत्र विसर्जन आणि स्नानाने केली जाते. शरीराची स्वच्छता जशी आपण बाहेरून करतो तशीच आतूनही करण्याची गरज असते. पूर्वी घरातील वडील मंडळी सर्व लहानामोठ्यांना आठवड्यातून एकदा ‘एरंडेल तेल’ पिण्याची सक्ती करीत असत. शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी ही प्रथा चांगली होती परंतु काळाच्या ओघात लोकांना ह्याचा विसर पडला. मात्र अशी स्वच्छता गर्भावस्थेत करणे योग्य नाही व शक्य नाही म्हणून काही निराळ्या प्रकाराने स्वच्छता करून मगच गर्भधारणेचा विचार करावा. आयुर्वेदात ह्यासाठी पंचकर्म करून देहशुद्धी करण्याचे वर्णन आहे. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण अशा ५ देहशुद्धीकर क्रियांना एकत्रिपणे ‘पंचकर्म’ म्हणतात. गर्भाधानाचा संकल्प केल्यावर ह्या ५ पैकी किमान बस्ति चिकित्सा तरी स्त्री-पुरुषांनी नक्कीच करून घेतली पाहिजे.
बस्ति म्हणजे काय –
    साध्या शब्दात बस्ति म्हणजे एनिमा. शौच मार्गाने तेल आणि काढे वापरून मोठ्या आतड्याद्वारे करण्याची ही एक चिकित्सा पद्धती आहे. इसवी सन पूर्व १५०० वर्ष इजिप्तच्या वैद्यकीय चिकित्सेत कोलोन लॅव्हेज म्हणजे आतड्यांची स्वच्छता करण्याचे उपाय ताडपत्रांवर लिखित आहे. ह्यामध्ये फक्त पाण्याचा वापर केला जात असे. आयुर्वेद शास्त्र त्याहीपेक्षा पुरातन आहे आणि त्यात बस्ति चिकित्सेचा उल्लेख पंचकर्म विषयात आढळतो. त्यात तेल, तूप, मध, काढे, गोमूत्र अशी अनेक प्रकारची द्रव्ये वापरली जातात.
     आयुर्वेदाने शरीराचे ढोबळ मानाने तीन हिस्से केले आहेत. डोक्यापासून हृदयापर्यंत कफाचा, हृदयापासून बेंबी (नाभी) पर्यंत पित्ताचा आणि बेंबीच्या खालचा वाताचा. गर्भाचे वास्तव्य शरीराच्या खालच्या भागात (वाताच्या) असल्याने तेथे स्वच्छता आणि स्निग्धता असणे गर्भवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
आयुर्वेदाने वाताच्या चिकित्सेत बस्ति चिकित्सेचे महत्व श्लोकरूपाने दिले आहे.
तस्यातिंवृद्धस्य शमाय नान्यद्वस्तेर्विना भेषजमस्ति किञ्चित् l
तस्माश्चिकित्सार्द्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सा अपि च बस्तिरेकैः ll अ. हृ. सूत्रस्थान १९/८७
अतिप्रमाणात वाढलेल्या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ति पेक्षा दुसरी कोणतीही चिकित्सा श्रेष्ठ नाही, अर्थात बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
स्त्री व पुरुषाने गर्भधारणेपूर्वी ही चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना बस्ति चिकित्सा केल्याशिवाय गर्भधारणा होऊ देणे म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता लांबच्या प्रवासाला जाण्यासारखे आहे.
पुरुषांमध्ये बस्तिचे महत्व -
       पुरूषबीज (शुक्र) निर्मिती वृषणात होते. त्याठिकाणी तयार झालेले शुक्र उदराच्या खालच्या भागात असलेल्या इंगॉयनल कॅनलच्या मार्गे शिस्नातून बाहेर पडते. ह्या कॅनलवर अख्ख्या उदराचा दाब पडतो. त्यामुळे उदरातील रचना जेवढ्या हलक्याफुलक्या असतील तेवढे ह्याचे वहन कार्य सुलभ होते. बरेचदा शुक्र तपासणी केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येते. अशावेळी फक्त बस्ति चिकित्सा करून पुन्हा तपासणी केल्यास ही संख्या वाढल्याचे दिसते. बस्तिमुळे आतड्यातील मळाचे खडे, साठलेला वायु बाहेर पडून जातो आणि इंगॉयनल कॅनलवरचा दाब हटतो. नळाला रबरी पाईप लावून नाल सोडला पण पाईपवर कोणी पाय ठेऊन उभा राहिला तर पाईपमधून पाणी बाहेर पडणार नाही व पाय हटवला की ताबडतोब पाणी येऊ लागते तसाच हा प्रकार आहे. वैद्यांनी बस्ति सुचवल्या बरोबर रुग्ण म्हणतात “आम्हाला दररोज शौचाला साफ होते, मग ही भानगड कशाला?” त्याचे उत्तर – “घरी रोज दैनंदिन साफसफाई आपण करतोच तरीही सणासुदीच्या वेळी कपाटे, पलंग किंवा इतर फर्निचर बाजूला केल्यावर लक्षात येते की त्यामागे किती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. शरीरातही असाच कचरा साठतो आणि त्याचा दाब इंगॉयनल कॅनलवर पडून शुक्रवहनात अडथळा होतो. शिवाय हा दाब शुक्रजनन यंत्रणेला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांवरही पडतो. त्यामुळे त्या भागांना प्राणवायूची कमतरता होते. परिणामी त्यांचे शुक्रजननाचे कार्य खालावते. झोपेत हातावर उशीचा किंवा शरीराच्या इतर भागाचा दाब पडल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बधिरता येते व त्याची हालचाल जवळजवळ बंद पडण्याची वेळ येते. दाब नाहीसा झाल्यावर परत रक्तपुरवठा सुरळीत होऊन त्याचे कार्य पूर्ववत सुरु होते. तसाच हा प्रकार आहे. बस्ति द्रव्यांमध्ये तेल, तूप, वनस्पतींचे काढे इत्यादींचा वापर धातुपोषणासाठी होतो आणि संपूर्ण प्रजनन यंत्रणेचे उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग होते.
स्त्रियांमध्ये बस्तिचे महत्व -
        स्त्री शरीरामध्ये बस्तिचे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण गर्भाच्या संपूर्ण वाढीची जबाबदारी तिच्या स्वास्थ्यावरच अवलंबून असते. पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणेच्या सर्व्हिसिंग साठी जसा बस्तिचा उपयोग होतो तंतोतंत तसाच उपयोग स्त्री शरीरातही होतो. बीजकोष, बीजवाहिन्या, गर्भाशय ह्या भागांवरील दाब आणि त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब हटतो. परिणामी त्यांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. बाजूचा दाब हटल्यामुळे गर्भाशयाचा विस्तार होण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. अशी जागा उपलब्ध न झाल्यास गर्भाची वाढ होण्यात बाधा येऊ शकते. गर्भाधानापूर्वी ही चिकित्सा केल्याने गर्भवाढीमध्ये अडथळा येत नाही.
गर्भधारणेनंतर -
      गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यापर्यंत पंचकर्मातील कोणताही उपक्रम करू नये. गर्भधारणेपूर्वी केलल्या देहशुद्धीचा सुपरिणाम आठव्या महिन्यापर्यंत टिकून राहतो. शास्त्रादेशानुसार आहार-विहाराकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून गर्भपोषण योग्यप्रकारे होत राहील.
आठव्या महिन्यात बस्ति महत्व -
      आठव्या महिन्यापासून गर्भाचे आकारमान जास्त वाढते म्हणून आयुर्वेदात आठव्या महिन्यात पुन्हा खालील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले बस्ति देण्यास सुचविले आहे.
शुष्कमूलककोलाम्लकषायेण प्रशस्यते । शताह्वाकल्कितो वस्तिः सतैलघृतसैन्धवः । . . . . अ.हृ. शारीर १/६५
अष्टमे बदरोदकेन बलातिबलाशतपुष्पापललपयोदधिमस्तुतैललवणमदनफलमधुघृतमिश्रेणास्थापयेत् पुराणपुरीषशुद्ध्यर्थमनुलोमनार्थं च वायोः, ततः पयोमधुरकषायसिद्धेन तैलेनानुवासयेत्, अनुलोमे हि वायौ सुखं प्रसूयते निरुपद्रवा च भवति, अत ऊर्ध्वं स्निग्धाभिर्यवागूभिर्जाङ्गलरसैश्चोपक्रमेदाप्रसवकालात्; एवमुपक्रान्ता स्निग्धा बलवती सुखमनुपद्रवा प्रसूयते | . . . . संदर्भ: सुश्रुत संहिता, शारीर १०/४
      आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते. अशा वेळी गर्भस्थैर्यासाठी विशिष्ट द्रव्यांनी सिद्ध असा निरूह बस्ति प्रयोग ग्रंथात नमूद आहे. अष्टांगहृदयकारांनी ह्यामध्ये शुष्क मुळा, आंबट बोरे, बडीशेप, तिळ तेल, तूप व सैंधव ह्या द्रव्यांचा अंतर्भाव केला आहे. सुश्रुत संहितेत बोरे, बला, अतिबला, बडीशेप, मांसरस, दुध, दह्याची निवळ, तेल, मीठ, गेळफळ, मध व तूप असा पाठ सांगितला आहे. निरुह बस्ति मुळे आतडी स्वच्छ होतात, त्यानंतर "सुप्रसव पिचु तेलाचा" अनुवासन बस्तिही घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे प्रसुती अतिशय सहज व सुलभ होते. ह्या औषधी द्रव्यांचा नेमका लाभ कसा होतो हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे. सूज्ञ आणि जाणकार मंडळींनी “अप्तोपदेश” समजून ह्या चिकित्सांचा अनुभव घ्यावा. अनेक वैद्यक व्यावसायिकांनी ह्या बस्तिचा प्रयोग आपल्या रुग्णांवर करून त्यापासून होणारे लाभ प्रत्यक्ष पाहिले आहेत. आयुर्वेदीय औषधे आणि चिकित्साक्रम निर्धोक असतात असे सर्वमान्य असले तरीही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय केवळ वाचून किंवा ऐकून बस्तिप्रयोग करणे योग्य नाही हे कायम लक्षात ठेवावे.

लेखक
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Saturday, June 4, 2016

प्रसूतिपश्चात काळजी

प्रसूतिपश्चात काळजी

*** वैद्य गोपाल म. जाधव***
(एम.डी. स्त्रीरोग तज्ज्ञ)

स्वातंत्र्योत्तर काळात देशाने जगाच्या स्पर्धेत विलक्षणीय गरुडभरारी घेतली. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, वैद्यक, क्रीडा इ. अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व क्रांतिकारक बदल झाले. त्यामुळे मनुष्यजीवन अधिक सुकर, सुखद व वेगवान बनले. यामुळे पूर्वापार अस्तित्वात असलेल्या अनेक प्राचीन भारतीय रूढींना खीळ बसली. संयुक्त कुटुंबपध्दती हा अतिशय मूलभूत वारसादेखील भारतीय जनमानसांमधून हद्दपार होण्याच्या उंबरठयावर आहे. त्यामुळे कुटुंबातील आबालवृध्दांपासून ते मानवी समूहाच्या प्रत्येक घटकांवर विपरीत परिणाम संभवतो आहे, नव्हे होत आहे.
कुटुंबनियोजनाच्या प्रभावी उपाययोजनेने तसेच साक्षरता व उन्नत विचारसरणीसारख्या अंगीकरणाने दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्यांची संख्या एक किंवा दोनपर्यंत मर्यादित झाली. या विलक्षण स्पर्धेत आपले बालक यशस्वीरीत्या टिकावे म्हणून बालसंवर्धन व सक्षमीकरणाकडे माणसं साहजिकरीत्या आकर्षली गेली. गर्भिणी परिचर्या, गर्भसंस्कार, प्रसवपूर्व मार्गदर्शन यांच्या दुकानदारीचा अक्षरश: ऊत आला असून ज्या बाबी सहजपणे कुटुंबातच होणे अपेक्षित होते त्यासाठी आता तज्ज्ञ लोकांकडून विशेष मार्गदर्शनाची गरज भासत आहे.
'सूतिका' अर्थात प्रसूत झालेली स्त्री. प्रसूती ही जरी स्वाभाविक बाब असली तरी बदलत्या जीवनशैलीत या अवस्थेला सामोरे जाण्यास सक्षमपणे तयार नसतात व त्यातून काही मनस्ताप व काही शारीरिक आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून हा विषय नमूद करणे क्रमप्राप्त आहे.
खरं तर सूतिकेच्या बाबतीत बऱ्याच वेळा अन्यायच होतो. सामाजिक विसंगतेचं ते एक जागतं प्रतीक आहे, कारण एखाद्या कुटुंबात नव्या पाहुण्याची चाहूल लागली की, आनंदोत्सवाचा असा धबधबा सुरू होतो की, त्या गर्भिणी स्त्रीचे प्रत्येक जण आपापल्या परीने कोडकौतुक करून तिच्या संगोपनामध्ये मदत करतो. शेकडो चित्रपटांमधून स्त्रीला पहिल्या वांत्या (उलटया/ओकाऱ्या) होताच तिच्यासाठी आंबट पदार्थ आणण्यासाठी केलेली धावपळ दर्शविली असेल, पण बाळाच्या जन्मानंतर मातेच्याही आरोग्याचे रक्षण महत्त्वाचे असते हे कधी कुणाला मांडावे वाटले नाही. घराघरातून गर्भिणीची घेतली जाणारी काळजी ही अप्रत्यक्षरीत्या बाळाची असते व प्रसवानंतर सर्वांचे लक्ष पुन्हा बाळावरच केंद्रित होऊन त्या बाळाला सुखरूपपणे जन्माला घालणाऱ्या मातेची आबाळ होतेच होते. त्यातही प्रसूतीवेळी टाके पडले असतील, चिमटा (Forcep) किंवा व्हॅक्युम पध्दतीचा प्रसव अथवा सिझेरीयन पध्दतीने प्रसूति झाल्यास तिच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडते. अशा नवप्रसूत मातांच्या सर्वसाधारण समस्या खालील कारणांमुळे होतात.
1) प्रसव प्रक्रियेमुळे शरीरात उत्पन्न झालेले स्वाभाविक दौर्बल्य.
2) बाळाच्या रडण्यामुळे अथवा त्याच्या संगोपनामुळे  दुर्बलावस्थेत मातेवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण.
3) वारंवार झोपमोड होणे.
4) स्वत:च्या आरोग्यापेक्षा बालकाची काळजी अधिक घेण्याची प्रवृत्ती.
5) विविध कारणांनी भूक मंदावणे. आहारातील वैषम.
6) मानसिक व भावनाप्रधान कारणांनी होणारा त्रास.
7) कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य न मिळणे अथवा वैचारिकदृष्टया मागास कुटुंबात स्त्रीची होणारी कुचंबणा.
8) झालेले अपत्य मुलगी असल्यामुळे होणारा त्रास.
9) व्यसनी पती, आर्थिक कारणे तसेच पूर्वीची लहान मुले असल्यास मातेच्या दु:खाला परिसीमा नसते.
10) शेतकरी, मजूर, कामगार स्त्रिया यांच्याकडेही सूतिका अवस्थेत पूर्णत: दुर्लक्ष होते व अशा स्त्रियांच्या स्वाभिमान व आरोग्य यांचे काही महत्त्व असते हे संपूर्णत: दुर्लक्षिले जाते.
11. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना कामाचा ताण, बाळापासून होणारी ताटातूट, रजेचा अभाव अथवा तत्सम कारणांमुळे मातृत्व त्रासदायक ठरते.
यापैकी अनेक स्त्रियांच्या नशिबी एकापेक्षा अनेक कारणास्तव त्रासदायक प्रसंग येतात व अशाप्रसंगी योग्य सहकार्य, सहानुभूती व चिकित्सेच्या अभावी माता व बालक यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे सूतिका अवस्था जनसामान्यांनी गांभीर्याने घेण्याची बाब असून त्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. अन्यथा निकोप व निरोगी समाजाचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश लाभणार नाही, हे निश्चित.
सदर बाबतीत आपणास पुढीलप्रमाणे खबरदारी घेता येईल.
अ) प्राथमिक काळजी : ही अवस्था सामान्यपणे बालकाच्या जन्मापासून पहिला आठवडा पूर्ण होईपर्यंतची आहे. वरकरणी पाहिले तर हा रुग्णालयातील काळ होय. प्रसवाच्या स्वरूपानुसार तीन, पाच किंवा सात दिवसांनी माता व बालक यांना रुग्णालयातून निर्गमीत करण्याची पध्दत असते. (प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी सुटी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर हा अनुभव हमखास येतो.)
1) प्रसवानंतर रक्तस्राव होणे अपेक्षित नसते. त्याकडे स्वत: रुग्णा व सोबतीच्या व्यक्तीने प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
2) प्रसवानंतर मल-मूत्र यांचे प्राकृतपणे विसर्जन होणे आवश्यक आहे. गर्भाशय संकोचक औषधे नियमित घ्यावीत.
3) प्रसवानंतर तत्काळ बालकास दूध पाजवण्यास घेणे आवश्यक आहे. बालकाने मातेच्या स्तनांना स्पर्श करणे, चोखणे इ. मुळेच स्तन्यनिर्मिती होते.
4) प्रसवपथाला टाके पडले असल्यास रुग्णेने त्या भागावर ताण पडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
5) टाके दररोज स्वच्छ ठेवणे व निर्जंतुक औषधाने साफ करणे आवश्यक आहे.
6) बालकास झोपवून दूध पाजू नये अथवा झोपेत बाळ अंगाखाली दबणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी.
ब) द्वितीयक काळजी : ही अवस्था रुग्णालयात यशस्वीपणे उपचार करून घरी परतल्यानंतरची असून एकदा ही अवस्था संपली की, तिची काळजी घेणे आवश्यक नसल्याचे सर्वांना वाटते. म्हणून घरी आल्यानंतरही मातेचे आरोग्य हा विषय संपत नाही. वास्तविकपणे एका बाळाच्या निर्माणार्थ खर्ची पडलेल्या शक्तीच्या पुनर्भरणाचा हा काल असून ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांच्या बाबतीत ही काळजी घेतली जात नाही. परिणामी अशा शक्तिहीन व दुर्बल माता तशाच अवस्थेत पुन्हा गर्भवती बनतात व दुर्दैवाची मालिका सुरूच राहते. त्यामुळे रुग्णालयांतून घरी आणलेल्या प्रसूत स्त्रीसाठी खालील बाबी अनिवार्य आहेत.
1) सुमारे एक ते दीड महिना कष्टाची कामे टाळणे.
2) रोज किमान सहा तास झोप झालीच पाहिजे. त्यातील किमान दोन तास तरी झोप सलग असावी.
3) सकस व संपूर्ण आहाराचे कटाक्षाने सहा महिन्यांपर्यंत सेवन.
4) शरीराच्या स्वच्छतेची कटाक्षाने काळजी घेणे.
5) घराबाहेरील पदार्थ सेवन करणे टाळणे.
6) दर दोन तासांनी बाळास दूध पाजणे व त्यानंतर स्तनातील उरलेले दूध काढून टाकणे.
7) दूध पाजताना नेहमी ताठ बसणे व पाठीच्या कण्यास आधार देणे आवश्यक आहे.
8) गरोदरपणातील रक्तवर्धक व कॅल्शियमयुक्त गोळयांचे तीन ते सहा महिन्यांपर्यंत सेवन करणे.
9) प्रदर, ज्वर, सनशोथ, शूल, उदरशूल यांसारख्या कारणांसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेणे.
10) बालकास प्रखर वारा, प्रकाश, गोंगाट, माणसांची वर्दळ यांपासून दूर ठेवावे. वातानुकूलित घरातही फार थंड वातावरण असू नये.
11) संतती प्रतिबंधन अवश्य करावे. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाने उपचारपध्दतीचा अवलंब करावा.
12) प्रसूतीपश्चात तूप, बदाम, काजू, मेथी लाडू यांचा प्रमाणबध्द वापर करावा. अति संतपर्णाने वजन वाढण्यापलीकडे काही साध्य होत नाही.
13) दुधाचे पदार्थ, शतावरी, भात यांसारख्या उपचारांनी तसेच माता आनंदी राहिल्याने स्तन्यप्रादुर्भाव उत्तम होतो. होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
14) बालकाच्या लसीकरणासाठी तत्पर राहणे व नियमित वेळेवर योग्य लसीचा डोस बालकास द्यावा.
15) सुरक्षित मातृत्व व बालसंवधनार्थ दोन अपत्यांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर ठेवावे.
गर्भिणी व सूतिका महिलांसाठी शासन स्तरावर विविध  योजना राबवल्या जात असून त्यात 'जननी सुरक्षा योजना', 'जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम', 'अब्दुल कलाम पोषण आहार योजना' इ.बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचा योग्य लाभ घेऊन राष्ट्रीय 'माता-बाल संगोपन' कार्यास मदत करून सामाजिक विकासामध्ये योगदान द्यावे.
                                           - साहाय्यक प्राध्यापक
                                     शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
                                        भ्रमणध्वनी : 8087043758
                                      gmahadev2009@gmail.com

Saturday, March 19, 2016

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या
गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबाने करायला हवा. तरच श्रेष्ठ बालक जन्माला येऊन माता-पित्याचे सार्थक करेल व माता पित्याच्या आनंदाचे कारण होईल. कवी कुसुमाग्रजांच्य
ा कवितेत बदल करून म्हणावेसे वाटते की, “मातेच्या गर्भात उद्याचा, उज्ज्वल उष:काल”
माता पित्यांनी अपत्य निर्मितीच्या घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्मशील आणि असामान्य अपत्य प्राप्तीसाठी पति-पत्नीने एकमेकांत तदात्म पावण्याच्या क्षणी तद्रूपता अनिवार्य असते. माता पित्याने गर्भनिर्मितीच्य
ा वेळी मिलनासाठी केवळ ‘शारीरिक सज्जतेचा’ नव्हे तर, ‘मानसिक सायुज्याचा’ क्षण हा विचार करावा. गर्भधारणेपासून मूल होईपर्यंत आई-वडिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
प्रसन्नतेने, आनंदाने केलेले भोजन देहाच्या कोषाची वृद्धी करते, पण असंतोषाने पंच पक्वान्नाचे केलेले भोजन मनामध्ये असंतोष निर्माण करते. म्हणून मातेने गर्भावस्थेत आपल्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. आहाराबरोबरच गर्भवतीचा विहार, दैनंदिन जीवनशैली, मनाची प्रसन्नता यांनाही विशेष महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष सर्वसाधारणपणे निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत होते. त्यामुळे सुप्रजजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. परंतु अलीकडे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. इसवी सनापूर्वी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्त्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होऊन सद्गुणी व मेधावी अपत्य प्राप्ती होते. श्रेयेसी व मनोवांच्छित प्रजोत्पादनाचे हे मूळ रहस्य आहे.
सुरक्षित मातृत्वासाठी जगातील पाच देश सर्वोत्तम आहेत. त्यात डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, आइज्लँड, वॉशिंग्टन व युरोपीय देशाचा समावेश आहे. आफ्रिका हा देश सुरक्षित मातृत्वासाठी अत्यंत धोकादायक आहे. मनुष्य जीवनाला एक निश्चित अर्थ व प्रयोजन प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीने गर्भिणी परिचर्येचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ गर्भवती झाल्यावर योगायोगाने जन्माला आलेले बालक म्हणजे संतती ह्याउलट योग्य परिचर्या पालन केल्यानंतर निर्माण होणारे बालक ह्यास ‘श्रेयसी बालक’ म्हणावे किंवा ‘चरकाचार्यांची श्रेयसी प्रजा’ अशी माझी धारणा आहे. प्रजजन ही बाब नैसर्गिक नसून मैथुन हा मजेचा विषय नाही. श्रेयसी प्रजेचे स्वप्न उभयतांनी पाहून मग संततीप्राप्तीचा संकल्प करावा हा ह्या लेखाचा उद्देश आहे. गर्भिणी परिचर्येतील महत्त्वाच्या विषयावर ह्या लेखात प्रकाश टाकला जाईल.
गर्भिणी आहाराबद्दल ह्यापूर्वी दोन लेखांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केल्याचे आठवत असेलच. सुप्रजजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये सामान्य दिनचर्या, ऋतुचर्या अंतर्भुत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राह्म मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारचे उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस म्हणजे १० महिने कसा वाढतो ह्या संदर्भातील विविचेन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. व वारंवार होणारे गर्भपात गर्भिणी शोथासारखे त्रास सुध्दा परिचर्येमुळे आटोक्यात आले आहेत. गर्भ विकासासाठी १० महिन्याच्या औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यांपासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते.
प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांच्या परिचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.
१) पहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गव्हाची गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणिक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.
२) मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वात दोषांचा प्रकोप करणारा आहार (वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये.
३) आहारामध्ये दूध, तूप, मध, लोणी, साखर यांचा समावेश करावा. तिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेन्द्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
४) लोणी, दुधाचे पदार्थ व ताजे दही – भात खाण्यास हरकत नाही. देशी गायीच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.
५) “पंचमे मनः प्रतिबुद्धतरं भवति ||” पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्त धातू, मांस धातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.
६) “षष्ठे बुद्धी: ||” बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोक्षुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.
७) “सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग: ||” मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात स्तनाग्रास तेल लावून स्तनाग्रे बाहेर हळूहळू ओढवीत. योनिभागी तिळाच्या तेलाने तर्जनीद्वारे अभ्यंग करावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. औषधी गर्भसंस्कार संचात वर्णित औषधांच्या जोडीला मज्जाधातू पोषक औषधे वापरण्यास हरकत नाही. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुंठी, चंदन सुध्दा मी वापरत असतो.
८) “अष्टमे अस्थिरी भवति ओज: ||” मुगाचे कढण दूध तुपासह तसेच आस्थापन अनुवासन बस्तीचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा. सुप्रसव तेलाचा पिचुधारण प्रयोग दररोज रात्री प्रसूतीच्या दिवसापर्यंत करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाचा पिचु योनीमार्गात ठेऊन सकाळी काढून टाकावा. ह्याने प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, स्नायूंची लवचिकता सुधारते, मार्ग निर्जंतुक राहतो व प्रसूती अगदी सहज सुलभ होते.
९) “नवम दशम एकादश द्वाद्शानाम् अन्यतम् जायते | अतो अन्यथा विकारी भवति ||” नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य विल पाहून मग सुतिकागार प्रवेश अर्थात रुग्णालयामध्ये प्रवेशित करावे.
१०) “नवमे विविधान्नानि दशमे....|” दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ. नी युक्त आहार सेवन करावा.
११) प्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.
योगासने व गर्भिणी परिचर्या
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायाम करावा.
१) पहिल्या तिमाहीतील योगासने - वज्रासन, सिद्धासन, सुखासन, कटिचक्राचसन
२) दुसऱ्या तिमाहीतील योगासने - भद्रासन, मार्जारासन, ताडासन, त्राटक
३) तिसऱ्या तिमाहीतील योगासने - पर्वतासन, प्राणायाम – शीतली, सित्कारी, भ्रामरी
आचार विषयक नियम – (काय करू नये)
१) भूक नसताना जेऊ नये. नाहक उपवास करू नये. गर्भाची वाढ मातेच्या अन्नग्रहणातून होत असते हे विसरू नये.
२) पंचकर्म करू नये.
३) रात्रीचे जागरण टाळावे.
४) बॅडमिंटन, धावणे, कब्बडी, खो-खो तसेच घरामध्ये धावपळ करू नये.
५) प्रवास टाळावा.
६) शक्यतो शारीरिक संबध टाळावा.
काय करावे –
१) कोमट पाण्याने नियमित स्नान करावे.
२) अवस्थेस अनुसरून सैल व सूती कपडे घालावेत.
३) झोपण्यास व बसण्यासाठी अधिक उंच नसलेली बैठक किंवा शय्या असावी.
४) मन प्रसन्न ठेवावे. सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये निसर्ग चित्रे व बालकांची चित्रे लावावीत. विनोदी पुस्तके, नाटके पाहण्यास हरकत नाही.
५) कार्यालीन कामे नियोजनपूर्वक करावी. वरिष्ठांशी वाद टाळावा.
६) सकारात्मक जीवनशैली अंगिकारावी.
गर्भवतीसाठी संगीत –
संगीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनः स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.
पित्याचा सहभाग
‘पितृत्व’ हे पण स्त्री मुळे मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ, बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बलाचा ७०% विकास गर्भावस्थेत होत असतो म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे व तिच्या मनाचा विचार करा.
गर्भाधारणेपूर्वी तज्ञांकडून पंचकर्म उपचार करून घ्यावा.
स्त्री व पुरुषाची शरीरशुद्धी करून जनुकातील विकृतीची तीव्रता कमी करता येते. आनुवंशिकता सर्वसाधारणपणे डी.एन.ए. मुळे ठरवली जाते. डी.एन.ए. ची रचना बदलता येत नाही परंतु गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आईवरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. गर्भास आहार न मिळाल्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरके व त्यांचा स्त्राव कमी होतो हे गरोदर उंदराच्या मादीवर प्रयोग करून सिद्ध झाले आहे. गरोदर उंदराच्या मादीला फॉलिक अॅसिड व व्हिटामिन B12 युक्त आहार दिला. तेव्हा तिला निरोगी पिल्ले झाली. दुसऱ्या मादीला अशाप्रकारचा आहार दिला नाही. तिला पिवळसर बारीक पिल्ले झाली. ह्याचाच अर्थ आहाराचा परिणाम गर्भस्थ बालकावर होतो. १९४४ – ४५ साली हॉलंडमध्ये दुष्काळ होता. तेथील गर्भवती स्त्रियांवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या बाळांना मधुमेहाचे प्रमाण दिसून आले, तसेच आहाराचा परिणाम मेंदूतील हायपोथॅलॅमिक ग्रंथीवर होऊन भूक नियंत्रणामध्ये फरक पडला आणि ही मुले तारूण्यामध्ये खुप लठ्ठ झाली. गरोदर मातेने कोकेन किंवा फेनिटॉईन सारखी औषधे घेतल्यास ह्याचा परिणाम गर्भावर होतो व बालपणी ल्युकेमिआ, मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पुढे सिझोफ्रेनियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. गोरोदर माता मानसिक तणावाखाली असेल तर अॅड्रिनॅलिन, ऑक्सिटोसिन इ. हॅार्मोन्स तयार होतात. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून पतीने आपल्या गरोदर पत्नीस प्रसन्न ठेवावे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919829686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज (इंडिया) प्रा. लि.
मुंबई
भ्रमणध्वनी - +917208777773
ईमेल – drjalukar@akshaypharma.com

Thursday, February 18, 2016

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .


सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .
‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा गर्भ बाहेर टाकल्यानंतर तिच्या शरीरात धातुक्षय व बलक्षय निर्माण होतो. हा क्षय भरून शरीर प्राकृत अवस्थेत येईपर्यंत तिला सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होऊन स्थिरत्व, दृढत्व, निरोगीपण राहणे शक्य होत नाही.
सूतायाश्चापि तत्र स्यादपरा चेन्न निर्गता l प्रसूताऽपि न सूता स्त्री भवत्येवं गते सति ll
. . . . . का.स. खिल, सूतिकोपक्रमणीयाध्याय
अपरापतन जेव्हां पूर्ण होते तेव्हांच स्त्रीला ‘सूतिका’ म्हणून संबोधले जाते.
सूतिकावस्था कालावधी –
सार्ध मासान्ते l म्हणजेच स्त्रीची सूतिकावस्था दीड महिन्यापर्यंत असते.
१. प्रथम १० दिवस : क्षत आणि व्रणामुळे ह्या काळातील परिचर्या व्रणरोपणाच्या दृष्टीने करावी. गर्भाशयात ज्या ठिकाणी अपरा विभक्त होते त्याठिकाणी ह्याचा केंद्रबिंदू असतो.
२. प्रथम दीड महिना : ह्या काळातील परिचर्या विशेषतः स्तन, स्तन्य आणि त्र्यावर्ता योनीच्या स्वास्थ्यरक्षणाच्या दृष्टीने आखली आहे. गर्भाशयाची पूर्वस्थिती प्राप्त करणे स्तन्यपुष्टी ह्या काळात अभिप्रेत आहे.
३. पुढील रजोदर्शनापर्यंतची कालमर्यादा : २ ते ६ महिन्यांपर्यंत हा कालावधी असू शकतो. काही सूतिकांमध्ये रजोदर्शन होण्यापूर्वीच पुन्हा गर्भधारणा होऊ शकते त्यांना ‘मिंध्या’ गर्भिणी म्हणतात.
सूतिका परिचर्या आवश्यकता –
प्रसूतीनंतर स्त्रीशरीर व उदाराचा खालचा भाग शिथिल होतो, वाढतो, शरीराला लट्ठपणा आणि बेडौलपणा येतो. शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्यही आलेले असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक आहे.
१) सूतिका व्रणी असते
२) तिच्यात रक्तस्रावजन्य व क्लेदजन्य धातुक्षय असतो
३) प्रसवक्रियेतील प्रवाहणामुळे वातप्रकोप झालेला असतो
४) धातुक्षय झाल्यामुळे अग्निमांद्य व धात्वाग्निमांद्य येते
५) ह्या काळात होणारे स्तन्यप्रवर्तन
६) योनिदोष व ग्रहबाधा ह्यांपासून सूतिकेचे संरक्षण करावे लागते
प्रसूतीच्यावेळी जेव्हां अपरा गर्भाशायापासून विलग होते तेव्हां त्याठिकाणी व्रण निर्माण होतो. म्हणून सूतिकेला व्रणी म्हणतात आणि त्यानुसार तिची व्रणरोपण किंवा क्षतरोपण चिकित्सा करावी लागते.
सूतिका कालांतर्गत परिवर्तन -
१) गर्भाशयाचा आकार कमी होणे (Involution of uterus) : अपरापतनानंतर लगेच गर्भाशय संकोच होऊन नाभीच्या खाली जघन संधानकाच्या ५ इंच वर असते. पुढे गर्भाशयाची उंची प्रतिदिन १.२५ सेंटीमीटरने कमी होते. ११-१२ व्या दिवशी गर्भाशय संकोचन श्रोणीमध्ये पूर्णपणे स्थिरावते.
२) गर्भाशयाच्या निम्नखंड व ग्रीवेमध्ये परिवर्तन : प्रसवानंतर गर्भाशयग्रीवेत क्षत होते. ग्रीवामुख हळूहळू संकुचित होते. जसजसे गर्भाशयमुख संकुचित होते, तसतशी ग्रीवा कठीण व जाड होते व ग्रीवागुहा पुनःनिर्मिती होते.
३) योनी व योनिमुख : प्रसवानंतर योनी व योनिमुख संकुचित होतात. परंतु अप्रसवेच्या स्थितीपर्यंत येत नाहीत व योनिशैथिल्य येते. तेथे वात दूषित होतो. योनीच्या अतिशैथिल्यामुळे पती व पत्नी दोघांचेही कामजीवन असमाधानी राहून मानसिक स्वास्थ्य खालावते. ह्याकरिता चिकित्सा अन्यत्र वर्णन केली आहे. (सूतिका परिचर्या तत्व क्र. ८ पाहावे)
सूतिका परिचर्या तत्वे –
१. आश्वासन : अपरापतन व प्रसव काळातील रुग्णेची मानसिक अवस्था लक्षात घेता ‘आश्वासन चिकित्सा’ सामान्य असली तरी आवश्यक आहे.
२. स्नेहन व मर्दन : सूतिकेच्या अधोदर, कटि व पृष्ठभागी दररोज सकाळी व संध्याकाळी बला तेल, तीळतेल, चंदनबला लाक्षादि तेल, सूतिकाभ्यंग तेल पैकी एकाने अभ्यंग करावे. त्यानंतर हळदीचे वस्त्रगाळ चूर्ण अंगात जिरवावे व उष्णोदकाने स्नान घालावे. मर्दनाने प्रकुपित वाताचे व तज्जन्य शूलाचे शमन होते. स्नानानंतर कटिप्रदेशी स्वेदन (शेक) करावे.
३. पट्टबंधन : वेष्टयेत् उदरम् l म्हणजेच पोट बांधणे, पश्चात स्वच्छ व जाड वस्त्राने कुक्षी, पार्श्व, पृष्ठ, उदर हे भाग घट्ट बांधावे. ह्याने गर्भवाढीमुळे शिथिल झालेल्या उदरात वायूचा प्रवेश होत नाही, उदाराचा आकार वाढून शरीर बेडौल होत नाही.
४. स्नेहपान : पट्टबंधनानंतर पचेल इतका स्नेह दीपन – पाचन द्रव्यांसमवेत द्यावा. ह्यात पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ, ओवा, जिरे, सैंधव, मरीच अशा द्रव्यांचा समावेश होतो. प्रसवामुळे उत्पन्न झालेल्या वातप्रकोपासाठी स्नेहपान चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते.
५. गर्भाशयशोधन : प्रसूतीनंतर गर्भाशयशोधनासाठ
ी मास, कृष्णबोळ गुळासोबत द्यावा व दशमूलारिष्ट समभाग पाण्यातून द्यावे. शिवाय लताकरंज आणि पिंपळमूळ चूर्णाचा उपयोग करावा. ह्याने गर्भाशय प्राकृत स्थितीत येण्यास मदत होते.
६. कोष्ठशोधन : कोष्ठशोधनार्थ एरंडतैल सुंठीच्या काढ्यासोबत द्यावे. ह्यामुळे प्रकुपित वायूचे शमन व मलशोधन होते. कोष्ठशोधनाने दोषदुष्टी दूर होऊन आमसंचिती होत नाही.
७. रक्षोघ्न : सूतीकेस उष्णोदकाने योनिप्रक्षालन करावयास सांगून योनिधूपन करावे. ह्यासाठी चंदन, धूप, लसूण साल, ओवा, शेपा, वचा, कोष्ठ, अगरु अशी प्रकृतीनुसार दव्ये वापरावीत.
८. योनिशैथिल्य : प्रसूतीनंतर योनिशैथिल्य आल्यास लोध्र साल, पलाशबीज, उदुंबरफल चूर्ण तेलात मिसळून त्याचे योनिधारण करावे. अम्ल – कषाय सिद्ध तेलाचे पिचुधारण करून मग क्षीरी वृक्षांच्या काढ्याने योनिधावन करावे. सायंकाळी योनिभागी अभ्यंग करून धूपन करावे. ह्याने योनिभाग निर्जंतुक होऊन शोफ, लाली, व्रण भरून येतात. अपत्यपथ व योनि संकुचित होऊन प्राकृत स्वरूपात येतात. ह्याचबरोबर सूतिकेने सर्वांग अभ्यंग करून घ्यावा. प्रसूतीपश्चात मातृ स्वास्थ्यरक्षणासाठी ‘सूतिकाभ्यंग तेल’ वापरावे.
प्रसवामुळे सर्व धातु दुर्बल होऊन त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी व गर्भाशयाचा प्राकृत संकोच होण्यासाठी विशेष अभ्यंग तेलाचा पाठ अष्टांगहृद्य शारीरस्थान २/४७ मध्ये वर्णन केलेला असून महर्षी वाग्भटांचा ‘गर्भविकास व मातृपोषणाचा’ विचार करतांना हे विसरून कसे चालेल?
आहार व विहार –
सुश्रुताचार्यांनी अभ्यंगानंतर वातघ्न औषधीपान व तद्नंतर परिषेक करण्यास सांगितले आहे. पंचकोल चूर्ण उष्णोदकाबरोबर, विदारिगंधादि सिद्ध स्नेह यवागु / क्षीर यवागु पानार्थ द्यावे. नंतर यव, कोल, कुलत्थ सिद्ध जांगल मांसरस, शालिगोदन बल आणि अग्निनुसार द्यावे.
कच्च्या डिंकाचा लाडू, सुंठ + तूप + साखर सकाळी घ्यावे. ह्यामुळे अधोदराच्या स्नायूंना बल प्राप्त होते व योनिशैथिल्य कमी होते.
लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे ह्यामुळे संचित क्लेद, रज, जरायु शेष बाहेर पडण्यास मदत होते. लसूण घालून तांदळाची धिरडी, तिखट मिठाचा सांजा सेवन करावा. लसणामुळे पुनर्नवीभवन, स्नायूंची झीज भरून काढणे व योनिभागाचे विवृतास्यत्व कमी होते.
सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून आल्याच्या वड्या, मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशोपा, बडीशेप यांचा वापर करून पथ्यकर अन्नाचा वापर करावा. ह्याने दर्जेदार व मुबलक दूध बालकाला मिळते.
खारीक पूड ओल्या खोबऱ्याबरोबर व दूध द्यावे, नाचणीची कांजी, कढण असे द्रव पदार्थ भरपूर द्यावे. ह्यामुळे स्त्रीची प्रकृती स्वस्थ राहून बांधा सुदृढ होतो. स्तनभागाला शैथिल्य येऊ नये म्हणून घट्ट बंध बांधावा.
आहारामध्ये खालील खीरींचा समावेश करावा –
• खारीक – बदाम खीर • खसखस – बदाम खीर • आहाळीवाची खीर • कापसाच्या सरकीची खीर • कणीक तुपात भाजून दुधात घालून केलेली खीर
ह्या खीरींमुळे वायूचा उपशम होतो, शरीराची झीज भरून निघते व स्तन्य निर्मिती मुबलक होऊन बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो.
देश व काळानुसार परिचर्या बदलते –
• मुंबईसारख्या आनूप देशात अभिष्यंद अधिक असल्याने स्नेहपान कमी व स्वेदन अधिक करावे.
• सोलापूर सारख्या कोरड्या म्हणजेच जांगल प्रदेशात स्नेह अधिक प्रमाणात द्यावा. मुलगा झाल्यास तेल व मुलगी झाल्यास तूप द्यावे असे काश्यपमुनी सांगतात.
• साधारण देशात स्नेह व स्वेद दोन्ही करावेत.
• विदेशी लोकांमध्ये मांसरस, रक्त किंवा मांसाचे सूप देतात.
• कंदमुळे, ओट्स, बीट, बटाटे इ. पदार्थांचा वापर आहारात करावा.
• ह्याशिवाय कुलसात्म्याचा विचार करून आहार द्यावा.
औषधी योग –
१. बृहत् पंचमुळांचा काढा सैन्धवासह , २. सौभाग्यशुण्ठी पाक, ३. मिश्री, पुनर्नवा, गोक्षुर, जेष्टमध चूर्ण तुपाबरोबर द्यावे. ४. सुंठ, साखर, तूप द्यावे, ५. विदारीकंद क्वाथ सैन्धवासह द्यावा. तूप, पिठीसाखर, केशर खाण्यास द्यावे ६. अनुलोमनासाठी भारङ्गी, काकडशिङ्गी, धामसा ह्यांचा क्वाथ द्यावा ७. गुडुची – आमलकी सिद्ध क्षीर द्यावे. ८. सूतिका कषाय –
सूतिका काळामध्ये त्र्यावर्ता योनि स्वस्थितीत येण्यासाठी भावप्रकाश वर्णित सूतिका कषायाचा वापर म. आ. पोदार रुग्णालयात मी करीत असतो.ह्याचा निश्चित असा लाभ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. ह्या पाठामध्ये गुडुची, सुंठ, सहचर, मुस्ता, उशीर, त्वक्, बृहत् पंचमुळे ह्या द्रव्यांचा वापर केलेला आहे. ह्या द्रव्यांची भरड समान मात्रेत घेऊन त्याचा ४० मिली काढा जेवणानंतर २ वेळा पानार्थ वापरावा. सदर काढा संचित दोष बाहेर पाडण्यासाठी असून स्वस्थ सुतीकेने वापरण्यासाठी आहे.
ह्या सूतिका कषायामुळे दीपन, पाचन व वातानुलोमन होऊन सूतिकारोग नियंत्रणात येतात.
Extra daily nutrient allowances for lactation (WHO / FAO – 1974)
Energy: 2600 Kcal, Protein: 44 gm, Vitamin D: 7.5 µg, Vitamin E: 8 mg, Vitamin C: 60 mg, Vitamin B2: 1.3 mg, Vitamin B3: 14 mg, Vitamin B6: 2 mg, Folate: 400 µg, Vitamin B1: 1.1 mg, Calcium: 800 mg, Iron: 18 mg, Zinc: 15 mg
योगासने –
प्रसूतीपश्चात नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते, तणाव कमी होतो, शारीरिक उर्जा वाढण्यास मदत होते. ह्यात पुढील आसनांचा अवलंब करावा –
मार्जारासन (Pelvic floor exercise), पवनमुक्तासन (Full squats/ Squat hold), उत्तान ताडासन (Toe taps / Bridge), वक्रासन (Kick backs), उत्कटासन (Brisk walking posture), भुजंगासन (Modified cobra posture)
वरील योगासनांचा आभास एकाच वेळेस न करता ती आपल्या शारीरिक बलानुसार, झेपेल तीच योगासने करावीत. क्रमाक्रमाने मार्जारासनापासून सुरुवात करून दरदिवशी एका आसनाचा अभ्यास करावा. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाघव प्राप्त होते, अग्नि प्रदीप्त होतो व सूतिकेला पूर्ववत कर्मसामर्थ्य प्राप्त होते. ह्या संदर्भात भारतीय शास्त्रज्ञ, महर्षी वाग्भट ह्यांनी अष्टांगहृदयात चपखल वर्णन केले आहे. ही आसने करतांना यम, नियमांचा अभ्यास सूतिकेने करावा अशी अपेक्षा आहे. प्राणायामादि प्रकार, नियम पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरच करावेत.
ज्याप्रमाणे एखादे जुने वस्त्र खूप मळले असता ते धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते फाटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सूतिका अत्यंत थकलेली व म्लान असल्याने जर तिला विकार झाला तर उपचार करणे कठीण असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करावे. ह्याने स्त्रीची प्रकृती उत्तम राहून वाढलेल्या गर्भाशयाचे आकुंचन योग्य होऊन तो प्राकृत स्थितीत जाणे व योनिभागाला प्राकृत आकार येऊन तेथील स्नायूंचे बल वाढणे, त्याचप्रमाणे श्रमजनित थकवा, जननेंद्रियांची शक्ती पुन्हा भरून येणे व अंतरेंद्रिये म्हणजे ‘फलकोषादिकांचे स्रवण योग्य होणे हे उद्देश साध्य होतात.
लेखक
प्राध्यापक वैद्य सुभाष मार्लेवार, M. D. (Ayurved),
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्या पौर्णिमा हिरेमठ
M. S. Gyn (Scholar)

Friday, February 12, 2016

"औषधी गर्भसंस्कार"


"औषधी गर्भसंस्कार"
'गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम'
         प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
संस्कार कशासाठी ?
         सोन्याचांदीचे दागिने पाहतांना आपले डोळे दिपून जातात पण मूळ खाणीतून मिळणारे सोने आहे तशा स्थितीत कधीही वापरता येत नाही. त्यात अनेक धातू, खनिजे, माती आणि अशुद्धी असतात. ह्या सर्वांमधून शुद्ध स्वरूपात सोने मिळविण्यासाठी त्यावर कित्येक संस्कार करावे लागतात. नंतर त्यातून दागिने घडविले जातात. अन्न पदार्थांवरही निरनिराळे संस्कार करावे लागतात तेव्हा ते पदार्थ रूपाने खाण्याजोगे होतात. संस्कार न करता प्रजनन होणे शक्य आहे पण सु-प्रजननासाठी शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने खऱ्या अर्थाने सु-प्रजनन साध्य करू शकतात. हे आहे संस्कारांचे महत्व.
काळाची गरज :
        काळानुसार वाढत असलेला शैक्षणिक कालावधी, मानसिक ताणतणाव, स्वतंत्र कुटुंब पद्धती, खाद्यपदार्थातील कृत्रिम व रासायनिक रंग / प्रिझरव्हेटिव्हज, मोबाइल सदृश किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम, प्रदूषण, लग्न करण्यासाठी कायद्याची वयोमर्यादा, भरमसाठ लोकसंख्या व त्यामानाने वैद्यकीय सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टी गर्भावस्थेतील दुष्परिणामांसाठी  कारणीभूत होतात. प्रजनन तर प्रत्येकच प्राणी करतो पण हे सर्व घटक अन्य प्राण्यांच्या बाबतीत होत नाहीत. प्रदूषण व विद्युतचुंबकीय लहरींचे परिणाम मात्र अन्य प्राण्यांवरही होतांना दिसतात. त्यामुळेच हल्ली चिमण्या अगदी दिसेनाशा झाल्या आहेत. मग गर्भाशयात वाढत असलेल्या चिमण्या जीवाला धोका पोचणार नाही का? त्यामुळे वंध्यत्व (मूल न होणे), बीजदोष (जेनेटिक आजार), प्रसूतीच्यावेळी अडचणी, गर्भस्राव, गर्भपात अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेत होणारे निरनिराळे आजार व त्यातून गर्भावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीत अनेक अनमोल रत्नांचा खजिना दडलेला आहे. ह्या खजिन्याची गुरुकिल्ली म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
दहा महिन्यांची गर्भावस्था :
         केवळ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदापासून सत्यनारायणाच्या कथेपर्यंत किंवा मराठी विश्वकोशातही गर्भावस्था दहा महिन्यांची असल्याचे वर्णन मिळते. ही कालगणना भिंतीवरच्या प्रचलित दिनदर्शिकेनुसार नसून स्त्रीच्या मासिक ऋतुचक्रानुसार, म्हणजेच २८ दिवसांचा महिना धरून केली आहे. ह्याप्रमाणे २८० दिवस असो किंवा ४० आठवडे, गर्भावस्थेचे आयुर्वेदाचे गणित किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होते.
औषधी गर्भसंस्कारांमधील १८ उत्पादनांचा संक्षिप्त परिचय :
अश्वमाह - पुरुष बीज सर्वांगीण सामर्थ्य वर्धनासाठी
प्रजांकुर घृत - श्रेष्ठ गर्भस्थापक नस्य, पुरुष व स्त्री उभायतांसाठी
फलमाह - निरोगी स्त्रीबीजप्रवर्तन, गर्भपोषण व विद्युतचुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठी
प्रथमाह ते दशमाह - आचार्य वाग्भट वर्णित गर्भावस्थेच्या १० महिन्यांचे १० मासानुमासिक कल्प
• किक्किस निवृत्ति तेल - किक्किस (स्ट्रेचमार्क) नियामक उदराभ्यंग तेल
• सुप्रसव पिचु तेल - प्रसूतीमार्ग सुस्निग्ध, लवचिक व निर्जंतुक करून नैसर्गिक - सुलभ प्रसूतीसाठी
• सूतिकाभ्यंग तेल - गर्भावस्था व प्रसूतीचा शीण घालवून उत्तम मातृ आरोग्यासाठी
• क्षीरमाह - दर्जेदार व मुबलक स्तन्य निर्मितीसाठी
• हेमप्राश - शास्त्रोक्त सुवर्णप्राशन कल्प, बालकाच्या बौद्धिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धनासाठी
सुप्रजननासाठी शास्त्रशुद्ध व काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आयुर्वेदीय उपाय म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार". ह्या "औषधी गर्भसंस्कारांचा" वापर करून अभेद्य असे सुरक्षा कवच निर्माण करता येईल. एवढेच नव्हे तर गर्भधारणा, गर्भविकास आणि मातृपोषण ह्या तीनही उद्देशांची परिपूर्ती साध्य होईल.
https://www.facebook.com/groups/

 
+917208777773
aushadhigarbhasanskar/

Wednesday, February 3, 2016

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.......

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........
         सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
         प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
      भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
        मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
         मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
           बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
           बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
         सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
        जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
         अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
       श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
       गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
         सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
       प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Friday, January 29, 2016

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार

सुप्रजननासाठी गर्भिणी आहार
अन्नात भवन्ति भूतानि |
अन्नाद्वारे सर्व प्राणि मात्रांची निर्मिती व वाढ होते.
       अन्न हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. शरीरातील प्रत्येक पेशी किंवा यंत्रणा आपल्या आहारातूनच निर्माण होत असते. म्हणूनच स्वास्थ्याच्या दृष्टीने आहाराला आहाराला विशेष महत्व आहे. स्त्रीशरीरात गर्भाचे रोपण व पोषण होत असतांना देखील हाच नियम लागू होतो. म्हणूनच भावी पिढी ही शरीर, मन, बुद्धी ह्या तिन्ही अंगांनी निरोगी निपजण्यासाठी अर्थात सुप्रजननासाठी आहाराचे महत्त्व लक्षात घेणे जरुरीचे आहे.
गर्भधारणा कशी होते?
     गर्भधारणा: गर्भाशयात शुक्र ( पुरुष बीज ) व आर्तव (स्त्री बीज ) आणि जीव / आत्मा ह्यांचा संयोग झाल्यानंतर त्यास गर्भ अशी संज्ञा दिली जाते. हे पुरुष व स्त्री बीज जर उत्कृष्ट असतील तर होणारी संतती सुद्धा चांगलीच होते. अशी सुप्रजा निर्मितीसाठी स्त्री व पुरुष ह्यांचे स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे हे तितकेच महत्त्वाचे असते.
    शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आहार, व्यायाम, निद्रा आदींचा समावेश होतो. ह्यांचे योग्य प्रकारे पालन केले तर मन हे अपोआपच प्रसन्न राहते. म्हणून अपत्य प्राप्तीचा संकल्प केल्यापासून सर्वांनी गर्भाधानापूर्वी किमान २ ते ३ महिने आपला आहार संतुलित ठेवून आरोग्य सुधारावे. ह्याने सुप्रजनासाठी नक्कीच हातभार लागेल.
गर्भधारणेत आहाराचे महत्त्व : गर्भवती स्त्री एकाच वेळी दोन जीवांचे पोषण करत असते. म्हणून तिला जास्त आहाराची गरज असते. गर्भाची सामान्य व अविकृत वाढ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीचा आहार पौष्टिक व संतुलितच असावा लागतो. कारण गर्भाची वाढ होणे हे पूर्णत: तिच्या आहारावर अवलंबून असते. तिने पोषक, पूरक आहर घेतला नाहीतर गर्भाची वाढ अपुरी होऊन गर्भाच्या सर्वांगीण विकासावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन करणे हे फार महत्त्वाचे आहे.
        संतुलित आहार: उष्मांक (calories), प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार (minerals), फायबर, पाणी इ. घटकांचा आहारात समावेश असावा. यामुळे माता व बालक ह्या दोहोंचे स्वास्थ्य उत्तम राहते.
बालकाचे पोषण योग्य होण्यासाठी सामान्य स्त्रीपेक्षा गर्भवती स्त्रीचा आवश्यकता ही ३०० कॅलरीने वाढलेली असते.
गर्भावस्था ही तीन टप्प्यांत विभागलेली असते.
पहिला टप्पा – गर्भधारणेपासून ते सुरुवातीचे तीन महिने (१ – ३ महिने)
दुसरा टप्पा - ४ ते ६ महिन्यांचा
तिसरा टप्पा – ७ ते ९ महिन्यांचा
पहिल्या तीन महिन्यांतील गर्भिणीचा आहार : प्रथम महिन्यात गर्भ हा अव्यक्त, कफस्वरूप असतो. पुढच्या महिन्यात त्या कफस्वरूप गर्भास घनता प्राप्त होते व सर्व महत्त्वाचे अंगप्रत्यंग इंद्रिये ही एकाच वेळी तिसऱ्या महिन्यात उत्पन्न होतात.
अशी महत्त्वाची जडणघडण पहिल्या ३ महिन्यांत होत असते. जन्माला येणाऱ्या बाळाची सूक्ष्म आकृती ह्या ३ महिन्यांतच तयार होत असल्याने ह्या महिन्यांतील पोषणावरच पुढील सहा महिने अवलंबून असतात. म्हणूनच योग्य व संतुलित आहार घेणे हे गर्भिणीच्या दृष्टीने आवश्यक असते. गर्भावस्थेतील सुरुवातीच्या ह्या काळातच गर्भिणीला मळमळ उलट्या होणे चक्कर येणे, अन्नाचा वास नकोसा वाटणे, खाण्याची इच्छा नसणे, इत्यादी त्रास उद्भवतात.
हे त्रास जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून पुढील उपाययोजना करावी.
• जास्त वेळ उपाशी राहू नये.
• झोपेतून उठल्या –उठल्या लगेचच काहीतरी खावे. जसे दूध, पोहे, दशमी काही नसेल तर गव्हाची बिस्कीटे (मैद्याची टाळावीत)
• एकाच वेळी भरपूर आहार घेण्यापेक्षा तो आहार ४ ते ६ वेळांमध्ये विभागून घ्यावा. ह्याने स्वतःचे व गर्भाचे पोषण व्यवस्थित होईल.
• चहा, कॉफीपेक्षा थंड दुधाचा समावेश करावा
• पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
प्रथम तीन महिन्यांत आवश्यक अन्नघटक -
सर्व संतुलित आहाराबरोबरच जीवनसत्व ब ९, फॉलिक अॅसिड हे येणे अत्यंत आवश्यक असते. गर्भधारणेच्या आधी १ - २ महिने व गर्भधारणा झाल्यावर पहिले ३ महिने फॉलिक अॅसिडयुक्त आहार व गोळ्या घेणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा बालकात Neural Tube defects & spina bifida सारखे विकार उद्भवण्याची शक्यता वाढते.
पुढील अन्नपदार्थातून फॉलिक अॅसिड मिळते.
• हिरव्या भाज्या – ब्रोकोली, कोबी, वाटाणा, कारले, दुधी, भेंडी, फ्लॉवर
• हिरव्या पालेभाज्या – पालक, मेथी, सरसो, मुळा, कोथिंबीर, पुदिना
• गव्हाचे पीठ, ओट, Corn Flakes
• फळे – टरबूज, संत्री, मोसंबी
• सुकामेवा – अक्रोड, बदाम
• जीवनसत्व अ
गर्भाच्या पूर्ण वाढीसाठी व त्वेच्या आरोग्यासाठी गर्भिणीने पूर्ण नऊ महिने ह्या जीवनसत्वांचा आहारात समावेश करावा.
गडद रंगाच्या भाज्यांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाणात अधिक आढळते उदा. पालक, मेथी, सरसो, कोथिंबीर, गाजर, लालभोपळा, तसेच संत्री, मोसंबी ह्या फळांतूनही जीवनसत्वे जास्त प्रमाणात मिळतात.
मांसाहार करणाऱ्यांसाठी – मासे व मटणाची कलेजी.
दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, ताक, तूप
गर्भिणीने पाणी पिण्याची प्रमाण वाढवले पाहिजे किमान दररोज ८ ते १० ग्लास इतके पाणी घेतले पाहिजे. ह्यासाठी थंड दूध, नारळपाणी, लिंबुपाणी ह्यांचा समावेश करावा. शक्यतो घरी बनवलेलाच फळांचा रस घ्यावा. उन्हाळा असेल तर शरीरातील पाणी कमी होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.
गर्भावस्थेतील दुसरा टप्पा (४ ते ६ महिने):
चतुर्थ मास
ह्या महिन्यात गर्भ अधिक व्यक्त होतो व त्याला स्थिरता प्राप्त होते. यावेळी गर्भाच्या अवयवांची विशेष वाढ सुरु होत असल्यामुळे गर्भिणीला शरीर जड झाल्याप्रमाणे वाटते.
गर्भाचे विशेष अवयव म्हणजे मेंदू, डोळे ह्यांच्या अविकृत वाढी साठी गर्भिणीला संतुलित आहाराबरोबरच ओमेगा – ३ फॅटी अॅसिडची आवश्यकता असते.
ओमेगा – ३ फॅटी अॅसिड पुढील अन्नपदार्थातून मिळतात.
माशांमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आढळून येते. (फिश ऑइल)
हिरव्या पालेभाज्या – पालक, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर
सुकामेवा – अक्रोड, बदाम, सूर्यफुलाच्या बिया
सोयाबीन व टोफूमध्ये ह्याचे प्रमाण मुबलक असते.
पंचम मास
गर्भस्थ शिशूचे रक्त व मांस ह्यांची अधिक वृद्धी होते. पृष्ठवंश, दात, अस्थि ह्यांची निर्मिती होऊ लागते. त्यामुळे ह्या महिन्यात कॅल्शियम व जीवनसत्व ‘ड’ ह्यांनी युक्त आहार जास्त घ्यायला हवा. त्याच्या बरोबर इतर अन्नघटकांचीही जोड असावी. ‘कॅल्शियम’ हे क्षार (मिनरल्स) आपल्याला पूर्ण नऊ महिनेच नव्हे तर प्रसूती पश्च्यात सुद्धा तितकीच आवश्यकता असते. कॅल्शियम हे गर्भातील बाळाच्या हाडाच्या मजबुतीसाठी आवश्यक असते.
सामान्य स्त्री / पुरुषास कॅल्शियमची आवश्यकता ५०० ते १००० मिलिग्रॅम रोज असते. गर्भावस्थेत मात्र हे प्रमाण १२०० मिलिग्रॅम असावे लागते.
योग्य प्रमाणात जर कॅल्शियमची गरज भागवली गेली नाही तर, गर्भवतीस पाठ, कंबर, सांधे दुखणे पायात गोळे येणे, बाळंतपणास त्रास होणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात.
अपुऱ्या कॅल्शियममुळे बाळाची हाडे ठिसूळ बनतात, दात उशिरा येणे व येताना त्रास होणे अशी लक्षणे उद्भवतात. हे टाळण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थ वाढविले पाहिजे.
कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक असते. म्हणून त्याचाही आहारात समावेश करावा.
सूर्यप्रकाशातून मुबलक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्व मिळते. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरण्याने फायदा होतो.
दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, लोणी, तूप
Seafood (माशांमध्ये) ‘ड’ जीवनसत्व असते.
- Fish liver oil हे ड जीवनसत्वाचे उत्तम माध्यम आहे.
शाकाहारींसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 mg vitamin D घ्यावे.
कॅल्शियम युक्त पदार्थ -
       सर्वात जास्त कॅल्शियम हे दुधात व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक, लस्सी, आईसक्रिम ह्यात असते. ह्यापैकी अतिथंड पदार्थ टाळावेत. दुधाचे अन्नमार्गात योग्य शोषण होण्यासाठी लाळेची आवश्यकता असते. त्याकरिता पोळ्यांची कणीक दुधात भिजवून पोळ्या कराव्यात. चावून खाण्यामुळे दुधातील कॅल्शियम अन्नमार्गातून उत्तमप्रकारे शोषले जाते व धातूंना शक्ती मिळते.
• धान्यात राजमा, सोयाबीन व नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
• हिरव्या पालेभाज्या – पालक, ब्रोकोली, मेथी, कच्चा कोबी, टोमॅटो, शेवग्याची पाने
• फळे – संत्री, लिंबू, स्ट्रोबेरी, किवी.
• सुकामेवा – बदाम, काजू, आक्रोड.
षष्ठ मास
      आतापर्यंत तुमच्या शरीराला संतुलित आहाराची सवय असते. त्यामुळे तोच आहार पुढेही चालू ठेवावा. उदा. काही प्रमाणत प्रथिने, डाळी, काही भाज्या, फळे, अंडी, सुकामेवा ह्यांचा आपल्या आवडीप्रमाणे आहारात समावेश करावा.
गर्भिणीला मसालेदार, चमचमीत पदार्थ, फास्टफूड, फरसाण, चॉकलेट, असे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. हा मोह शक्यतो टाळावा. तरीही खाण्याची इच्छा तीव्र वाटल्यास वरील पदार्थ खाण्याआधी प्रथम एखादे फळ (सफरचंद, केळे) खावे व त्यावर वरील एखादा पदार्थ खावा. त्यामुळे खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल व ते जास्त खाल्ले जाणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनावश्यक कॅलरीज शरीरात जाणार नाहीत व अवाजवी वजन वाढणार नाही.
      त्याचप्रमाणे चहा, कॉफीचे अति सेवन गर्भिणीच्या दृष्टीने अयोग्य असते. चहा, कॉफीमुळे शरीरात लोहाचे पोषण योग्य प्रकारे होत नाही व पुढे जाउन रक्ताल्पता होण्याची शक्यता असते. गर्भिणीला लोहाची सर्वात अधिक गरज गर्भावस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात असते. कारण लोह हे गर्भाच्या व वारेच्या वाढीसाठी आवश्यक असते.
लोहाची कमरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त औषधांचा वापर केला जातो. पण काहींना ह्या औषधांमुळे मलबद्धता होते. म्हणून ह्या औषधां बरोबर लोहयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करावा.
लोहयुक्त पदार्थ – मटण (meat) व विशेषत: लिव्हरमध्ये लोहाचे प्रमाण प्रचुर असते. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांनी ह्या पदार्थाचा आहारात समावेश करावा.
हिरव्या पालेभाज्या - पालक, मेथी, सरसो, पुदिना, कोथिंबीर .
• पूर्ण धान्य (whole grains) मध्ये लोह असते.
• फळांमध्ये - सफरचंद, डाळींब.
• सुकामेवा – यात विशेषतः बदामाचा वापर करावा. त्याचबरोबर अंजीर, जर्दाळू (apricoats) सेवन करावेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे लोहाचे शोषण शरीरात अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याच्या बरोबर ‘क’ जीवनसत्व (Vitamin - C) घेणे हे अत्यंत आवश्यक असते.
जीवनसत्व ‘क’ पुढील पदार्थातून मिळतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे लिंबू त्यासाठी जेवणात मधूनमधून लिंबू पिळणे आवश्यक असते.
मोड आलेले मूग, मेथ्या.
फळ – संत्री, मोसंबी.
गर्भावस्थेतील तिसरा व अंतिम टप्पा (७ ते ९ महिने)
सप्तम मास
ह्या अवस्थेत सर्व अंगप्रत्यांगानी गर्भ परिपूर्ण होतो, त्याच्या अवयवांचे स्वरूप विकसित होते. गर्भाच्या वाढीमुळे गर्भाशयाचा आकार वाढतो व त्याचा दाब आतड्यांवर पडतो. त्यामुळे मलबद्धता, अॅसिडीटी (जळजळ, अम्लपित्त) ह्यांसारखी लक्षणे निर्माण होतात.
अम्लपित्त जळजळ जास्त होत असल्यास एकाच वेळी पूर्ण आहार घेण्यापेक्षा थोड्या – थोड्या वेळाने आहार घ्यावा.
• दोन खाण्यामध्ये जास्त अंतरही ठेवू नये. प्रत्येक २ - ३ तासाने काहीतरी पौष्टिक खावे.
• मलबद्धता होत असल्यास भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. व चोथा (fibre) युक्त आहार घ्यावा. त्यामुळे पचन सुखकर होईल व उत्सर्जन क्रियेस त्रास होणार नाही.
• चोथा (fibre) युक्त पदार्थ
• सफरचंद, केळी, गाजर, ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, वाटाणा, हिरव्या पालेभाज्या.
(फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा ती चावून खाल्लीतर फायदा अधिक होतो.)
आहारात चोथायुक्त पदार्थाचा समावेश करत असेल तर त्याबरोबर पाणी पिण्याचे प्रमाणही वाढलेले पाहिजे. कारण चोथायुक्त पदार्थ हे पाण्याचे शोषण करतात. म्हणून गर्भिणीने पूर्ण नऊ महिने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
पोटसाफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अष्टम मास
ह्या महिन्यात सर्व अंगप्रत्यंग पूर्णत्वास येत असतात. कारण शेवटच्या ३ महिन्यातच गर्भाची वाढ झपाट्याने होत असते. म्हणून यावेळेला सर्व अन्नघटक युक्त आहार म्हणजे प्रथिने, जीवनसत्व (अ, ब, क, ई, के) कर्बोदके, कॅल्शियम हे सर्वच जेवणात असायलाच हवे.
नवम मास
गर्भिणीने वर उल्लेख केल्याप्रमाणे संतुलित आहाराचे सेवन केले असेल तर नऊ महिने पूर्ण होण्यापर्यंत तिचे वजन हे ११ ते १२ किलो पर्यंत वाढणे अपेक्षित असते. हे वाढलेले वजन गर्भपोषण व आरोग्याच्या दृष्टीने हितकर असते.
असा हा गर्भ सर्व शरीरावयांत परिपूर्ण पुष्ट होऊन प्रसवोन्मुख होतो.
गर्भिणीने विशेषकरून काय खाऊ नये ?
पपई, अननस, स्ट्रोबेरी, मेथी, बीन, पावटे, फ्रीज मधले थंडगार पदार्थ, बर्फ टाकलेले दूध, शिळे ताक हे पदार्थ वर्ज्य करावेत. गरम पदार्थाबरोबर मध खाऊ नये, मैद्याची बिस्किटे, ब्रेड, वडापाव, पिझा खाऊ नये. नॉन सीझनल फळे, डबाबंद पदार्थ, मिल्कशेक, चीज, पनीर शक्यतो खाऊ नये.
थोडक्यात ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १७ मधील खालील ओव्या गर्भिणीने लक्षात ठेवाव्यात:
तेवीं जैसा घेपे आहारु| धातु तैसाचि होय आकारु|
आणि धातु ऐसा अंतरु| भावो पोखे ||११६||
जैसें भांडियाचेनि तापें| आंतुलें उदकही तापे|
तैसी धातुवशें आटोपे| चित्तवृत्ती ||११७||
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे| तैं सत्त्वाची वाढी पाविजे|
राजसा तामसा होईजे| येरी रसीं ||११८||
तरी सात्त्विक कोण आहारु| राजसा तामसा कायी आकारु|
हें सांगों करीं आदरु| आकर्णनीं ||११९||
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Visit Our Page