नवी दिल्ली,15 मार्च : देशातल्या सर्व राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्द असून फक्त काही राज्यं सोडली तर इतर राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जावू शकत नाही असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीतल्या हॉटेल ताज पॅलेस मध्ये आयोजित ‘न्यूज18 रायझिंग इंडिया समीट’ मध्ये ते बोलत होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नसल्याने तेलुगू देसम पक्षानं केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेत एनडीएलाही राम राम केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राज्यघटनेनुसार केवळ काही राज्यांनाच असा दर्जा दिला जातो. राज्यघटनेला सोडून सरकार काहीही करू शकत नाही. एका राज्याला दर्जा दिला की इतरही राज्यं अशीच मागणी करतील असंही ते म्हणाले. याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायाडू हे फक्त राजकारण करत असल्याची टीका केली. आंध्रच्या विकासासाठी जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा द्यायला केंद्र सरकार तयार आहे. मात्र विशेष राज्याचा दर्जा देण्याचा हट्ट योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तेलुगू देसमने पाठिंबा काढला असला तरी राजकारणात काहीही घडू शकते अशी सूचक प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.