अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या आईल १० वर्षांची सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या १३ वर्षाच्या अपंग मुलाला बॅटने बेदम मारहाण करुन त्याचा खून करणाऱ्या आईला १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी हा आदेश दिला आहे.
राखी तरूण बालपांडे (वय -४१) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. चैतन्य तरूण बालपांडे (वय-१३, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना ऑगस्ट २०१५ मध्ये घडली होती. याप्रकरणी आरोपी राखी बालपाडेवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
राखी हि  मूळची नागपूरची असून, तिचे तिच्या पतीशी पटत नसल्याने तिने पतीपासून घटस्फोट मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. राखी बालपांडे ही उच्चशिक्षीत असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत होती. राखी बालपांडे ही घटनेच्या दोन वर्षापासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहत होती. तिचे फ्लॅट मालक असलेल्या सुमित मोरे याच्यासोबत ओळख होऊन त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते.
जाहिरात
राखी ने पुण्यात आल्यानंतर चैतन्यला पुण्यातील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकले होते. ती त्याचा चांगला सांभाळ करत होती. चैतन्य पायाने अपंग होता. राखीच्या घरी सुमित आणि त्याच्या दोन मित्राचे सारखे येणे-जाणे होते. चैतन्य १३ वर्षाचा असल्याने त्याला सर्व समजत होते. त्यामुळे राखीला त्याची अडचण भासू लागली होती. त्यातच तो अपंग असल्याने कायम घरातच राहायचा. राखी आणि सुमितला चैतन्य अडसर ठरू लागल्याने त्याला बॅटने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता चैतन्य पडल्याने त्याला मार लागल्याचे सांगितले. मात्र, तपासामध्ये चैतन्य याला बॅटने मारहाण केल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी राखी विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. चैतन्य हा अपंग आणि तेरा वर्षाचा होता. त्याने पूर्ण जगही पाहिले नाही. त्याचा त्याच्या आईवर विश्‍वास असताना तिने अशा प्रकारचे कृत्य केले. मुलाला बॅटने मारहाण करून त्याला जखमी केले, त्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला असल्याचा युक्तीवाद करत त्यांनी राखीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने राखीला खूनप्रकरणी दोषी न धरता सदोष मनुष्यवध प्रकरणी शिक्षा सुनावली. तर, सुमित मोरे विरुद्ध सबळ पुरावे न आढळल्याने त्याची न्यायालयाने मुक्तता केली.
जाहिरात